maharashtra teacher ekyc mandatory salary
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांचे ई-केवायसी केली नसल्यास त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रोखले जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र सादर करावे असे परिपत्रक जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे शिक्षकांची ऐन उन्हाळ्यात बँकेत धावपळ वाढली असून या पत्रकामुळे शिक्षक संघटनाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेनंतर आता निकाल लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. काही शिक्षकांची नावे जनगणनेसाठी आलेली आहेत. त्यामुळे प्रशिक्षण सुरू झाले आहे. अशी परिस्थितीत शिक्षण विभागाने २२ एप्रिल रोजी ई-केवायसीसंदर्भात परिपत्रक जारी केले. ज्या शाळातील कर्मचाऱ्यांचे ई केवायसी अद्याप पूर्ण नाही अशा शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याची शक्यता आहे. सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांना केवायसी बंधनकारक केले आहे.
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व शालार्थ पोर्टलवरील डेटा अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांची वेतन देयके ऑनलाईन प्रणालीतून स्वीकारली जाणार नाहीत, असे शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्याच्या केवायसी पूर्ण करून प्रमाणपत्र सादर करावे असे पत्रक प्राथमिक शाळांना पाठवण्यात आले आहे. ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनी करून घ्यावी, अन्यथा एप्रिलचे वेतन अदा केले जाणार नाही.
- निलिमा नाईक प्राथमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी