रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुती उमेदवाराच्या न विजयासाठी विरोधी उमेदवारांना न बुचकळ्यात टाकणारे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील ३२ पैकी ३२ मतदारांची मते मोजून घ्यावी, असे मतदार मेळाव्यावेळी सांगितले. परंतु ३ स्वीकृत नगरसेवकांसह प्रत्यक्षात ३५ मतदार असून पालकमंत्र्यांनी शिवसेना भाजप नगरसेवकांची संख्या सांगितली की शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ३ उमेदवारांना धरून ३२ मते न सांगितली याचा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नेत्यांकडून शोध सुरू झाला आहे.
शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत हे प्रत्येकवेळच्या निवडणुकीत वेगवेगळ्या रणनिती वापरतात. निवडणुका झाल्यानंतर ते भाषण किंवा विधानामधून सूचक वक्तव्य करतात. या प्रकारचे तंत्र ज्याला समजायचे तो समजून घेतो. त्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी विरोधी उमेदवारांचे मनोधैर्य खच्ची होईल आणि निकालापूर्वीच प्रतिस्पर्धी पराभव मान्य करेल, असे तंत्र वापरले होते.
त्यानंतर आता त्यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रतिस्पर्थ्यांना बुचकळ्यात टाकणारे तंत्र वापरले आहे. महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या लोकप्रतिनिधी म्हणजेच या निवडणुकीतील मतदारांचा मेळावा झाला. त्यामध्ये पालकमंत्र्यांनी रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेना -भाजपची ३२ पैकी ३२ मते मोजून घ्यावीत, असे उमेदवार अनिकेत तटकरे यांचे वडील खा. सुनिल तटकरे यांच्याकडे कटाक्ष टाकून सांगितले.
परंतु प्रत्यक्षात रत्नागिरी नगर परिषदेतील नगर सेवकांचे समीकरण वेगळेच आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील ३२ पैकी २९ नगरसेवक शिवसेना-भाजप युतीचे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे दोन आणि भाजपचा १ स्वीकृत नगरसेवक आहे.
निवडून आलेले युतीचे २९ आणि स्वीकृत ३ नगरसेवकांची बेरीज जशी ३२ होते तशी युती आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ३ नगरसेवकांची बेरीज ३२ होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वीकृत नगरसेवक धरून ३२ मते मोजून घ्या सांगितली की उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ३ नगरसेवकांची बेरीज धरून ३२ मते सांगितली, या प्रश्नाचे उत्तर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून शोधले जात आहे.
या निवडणुकीत मतदार मर्यादीत असल्याने कमी वेळेत मतदारांना संपर्क साधने सहज शक्य होते. त्यामुळे मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता असते. पक्षीय मतदारांपैकी अधिक मते पडावीत, अशी बेगमी करावी लागते. त्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्याचाच एक भाग म्हणून या तंत्राकडे पाहिले जात आहे.