खेड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील नातूनगर धरण जिथे बारमाही पाणी साठा आहे, त्या धरणाच्या भडगाव बाजूच्या कालव्याला गळती लागल्याची शंका व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या निदर्शनानुसार, उन्हाळी शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी कालव्यातून बाहेर पडून रस्त्यांच्या बाजूच्या पावसाळी नाल्यातून वाहत आहे.
या प्रकारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे पाणी फक्त काही ठिकाणी टिकते, तर काही बाजूंच्या कालव्यांमधून ते वाया जाते. एका बाजूला कोकणाचा सिंचनाचा अनुशेष भरून निघताना दिसत नाही, तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, असे ते म्हणाले. स्थानिक प्रशासनाला आणि सिंचन विभागाला या गळतीची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासते, असे पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.