रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाल्याचे पाणी वाढले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (दि. १५) सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात१४ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदी, राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.