रत्नागिरी : गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी काही प्रमाणात ओसरला. मात्र, काही भागात पावसाने उसंत घेत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. मंगळवारी दिवसभरात ७२ मि.मी. च्या सरासरीने साडेसहाशे मि.मी. एकूण पाऊस झाला.
अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा प्रभावीपणे सक्रीय असल्याने आगामी दोन दिवस किनारी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी आहे. सोमवारनंतर मंगळवारीही अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्याला गेले दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. मात्र मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील वाढलेला जलस्तर ओसरण्यास मदंत झाली.
काल खेडची जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली होती. तसेच जिल्ह्यातील प्रमुख नद्यातील जलस्तरात वाढ झाली होती. मात्र पावसाने मंगळवारी उसंत घेतल्याने येथील पूर सदृश्य स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. मंगळवारी पावसामध्ये सातत्य नसल्याने आणि जोरही कमी असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात विस्कळीत झालेले जनजीवन काही अंशी सुस्थितीत आले. जोरदार पावसाने जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. मात्र मंगळवारी जगबुडीतील जलस्तर इशारा पातळी पासून ०.५० मिटरपासून उंचावला होता.