मंडणगड : रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल नुकत्याच घडलेल्या बार्जेस धडक प्रकरणानंतर वाहतुकीस बंद होता. तसेच गतवर्षी दुरूस्तीच्या कारणांमुळे वारंवार हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने भविष्यात या पुलाच्या उपयुक्ततेची चर्चा सुरू झाली असून आंबेत पुलाला पर्यायी नवीन पुलाच्या मागणीला आता पुन्हा एकदा जोर मिळत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या या पुलामुळे मंडणगड आणि दापोली तालुके मुंबई पुण्याशी अधिक जवळच्या रस्तेमार्गान जोडले गेले. दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांच्या दळणवळणाच्या विकासात या पुलाने महत्वाची भूमिका बजावली आहे.
विशेषतः मंडणगड सारख्या दुर्गम तालुक्याच्या विकासाला या पुलामुळे गती मिळाली. मात्र पुलाला आता सुमारे पाच दशकांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2017 मध्ये झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुलाच्या जीर्णतेबाबत पहिल्यांदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर विविध दुरुस्ती कामांसाठी अनेकवेळा पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागली, प्रत्येकवेळी येथील वाहतूक बंद झाल्याचा त्या-त्या वेळी नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे.
व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्ण यांना पर्यायी व अधिक लांब पल्ल्याच्या मार्गाचा आधार घ्यावा लागला. आंबेत पूल बंद झाल्यास त्याचे दृष्य परिणाम मंडणगड व दापोली तालुक्याने अनुभवले आहेत. या दोन तालुक्यांच्या रस्तेमा र्गावर असलेल्या हॉटेल व पर्यटनदृष्ट्या असलेल्या व्यवसायांवर त्याचा थेट परिणाम होऊन येथील अर्थकारण विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. पुलाच्या बंद अवस्थेने वाहतुकीच्या कारणांनी स्थानिक बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या घटते आणि पर्यटन व्यवसा यालाही त्याचा फटका बसतो. एकूणच बंद पुलामुळे येथील स्थानिक विकासाचा वेग मंदावतो.
दरम्यान, पुलाचे महत्व लक्षात घेऊन निघालेल्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामात तत्कालीन युती, आघाडीच्या शासनाने वेळोवेळी लक्षही घातलेले आहे. पण आता मात्र यावर दीर्घकालीन उपाय म्हणून नवीन पुलाच्या उभा-रणीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. दापोली मतदारसंघातील दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या प्रवासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा विषय केवळ राजकीय आश्वासनांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील वाहतुकीची वाढती गरज, सुरक्षिततेचे निकष आणि विकासाचा वेग लक्षात घेऊन आंबेत पुलाला पर्यायी नवीन पूल उभारणे ही आता गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.