

रत्नागिरी :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार ४७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी मागील महिन्यात २ लाख ७१ हजार ९५६ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेचा लाभ यशस्वीरीत्या जमा करण्यात आला. मात्र, विविध तांत्रिक त्रुटी आणि निकषांमध्ये न बसल्यामुळे तब्बल १ लाख ५ हजार ५२१ बहिनींचे अर्ज अपात्र ठरले आहेत.
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अपात्र ठरलेल्या अर्जामध्ये प्रामुख्याने कागदपत्रांमधील त्रुटी आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्याचे दिसून आले आहे. तांत्रिक त्रुटीमध्ये वेळेत ई-केवायसी पूर्ण न करणे आणि बँक खात्याशी जोडलेला आधार क्रमांक चुकीचा असणे, 'संजय गांधी निराधार योजना' किंवा इतर तत्सम शासकीय मानधन योजनांचा लाभ घेत असणे, शासकीय कर्मचारी असणे, कुटुंबात चारचाकी वाहन (RTO नोंदणीकृत) असणे, किंवा कुटुंबातील कोणी सदस्य करदाता असणे, २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षापेक्षा जास्त वय असणे,
या कारणांसह अर्जामध्ये पुरुष किंवा तृतीयपंथी घटकांची नोंद असणे, तसेच काही महिलांनी स्वतःहून हा लाभ बंद करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती अर्ज सादर करणे. योजनेचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्रुटी असलेल्या अर्जामधील दुरुस्तीबाबत योग्य ती कार्यवाही केली जात आहे.
छाननी प्रक्रियेमध्ये तांत्रिक चुका
महिला व बालकल्याण विभागामार्फत झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये या तांत्रिक चुका पुढे आल्या. त्यामुळे १ लाख ५ हजार ५२१ बहिनींचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. सध्या २ लाख ७१ हजार ९५६ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेचा लाभ यशस्वीरीत्या जमा झाले.