चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. सध्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी महामार्गालत व मध्यभागी वृक्षारोपणाचे काम मार्गी लागलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे १ मे रोजी चिपळूणातील राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर गाडून घेत आंदोलन करणार असल्याची माहिती हायवे वृक्ष लागवड हक्क समिती चे शहानवाज शाह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीचा पंचनामा करताना जलदत आणि सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शाह म्हणाले, महामार्गाच्या चौपदरीकरणात इंदापूर ते झाराप दरम्यान एकूण १० टप्पे करण्यात आले. पहिले ८ टप्पे हे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात समाविष्ठ आहेत. तर सिधुदुर्ग जिल्ह्यात केवल २ टप्पे येतात.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २८३.३३ किमीचा भाग आहे. चौपदरीकरण कामात १ लाख ६ हजार ७३७ झाडांची अधिकृत कत्तल केली असली तरी प्रत्यक्षात तिप्पट झाडे तोडल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन विभागाकडे घेतलेल्या परवानगीत केवळ आंबा, सांग, जांभूळ, किंजळ, छैन व खैर या हा जातींचाच समावेश आहे. मात्र या महामार्गावर वड, पिंपळ, उंभर, पायर बाभूळ बेल असे अनेक वृक्ष होते. त्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार झाडे लावून त्याची निगा राखण्यासाठी २०२२ पासून याबाबतचा पाठपुरावा करत आहोत.
त्यामुळे इंदापूर ते तळेगाव राजापूर व गुहागर विजापूर मार्गावर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याच सव्र्व्हेक्षण करून रस्त्याच्या मध्यभागी व बाजूला २ फूट लांब, २ फट रूंद व दोन फूट खोल खड्डे अद्याप मारलेले नाहीत. रस्त्याच्या मध्यभागी अनेक ठिकाणी दगड, गोठे टाकले आहे. तेथे सुपीक माती टाकून झाडे लावावीत. पहिल्या पावसात पाच ते सात फुट उंचीची मजबूत खोडांची रोपे लावावीत.
झाडांच्या शेजारील वाढलेले गवत काढण्यात यावे. झाडांना पुरण व रिंगण करून त्याला पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी देखील समितीने याच विषयावर आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर पावसाळ्यात कामथे येथे झाडे लावण्याचा शुभारंभ झाला. मात्र पुढे नियमीत हालचाली झाल्या नाहीत. महामार्गाचे ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करत आहे. मात्र, आता कृती झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा शाह यांनी दिला. यावेळी समितीचे अजित जोशी, राम रेडीज, भरत लब्बे आदी उपस्थित होते.