चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा
आज देश इंधन टंचाईला सामोरा जात असताना कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे उबाठा शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत व प्रमुख विरोधक अशोक वालम हे आता कुठल्या बिळात लपले आहेत? असा प्रश्न करुन त्यावेळी रिफायनरी झाली असती तर कोकणात दोन लाख रोजगारासह आज इंधनाचा तुटवडा भासला नसता, असे येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.
आमदार जठार पुढे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुसार जून महिन्यापर्यंत तपपूर्ती उपक्रमाचे आयोजन केले आहे. बारा वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारने अत्यंत महत्त्वाचे देशहिताचे जे निर्णय घेतले त्या अंतर्गत देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर आणली, जम्मू-काश्मीमधील ३७०, ३५ए ही कलमे रद्द केली, ५०० वर्षांपासूनचा राम मंदिरचा प्रश्न सोडविला, युपीआय व डिजिटल क्रांती, जगातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणून गौरव होतो, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांच्या माध्यमातून ६० कोटी जनता लाभार्थी झाली.
महामार्ग, रेल्वे, विमानतळ यामध्ये मोठी प्रगती झाली. जीएसटीच्या माध्यमातून 'एक राष्ट्र एक कर' प्रणाली, आयुष्मान भारत यासारख्या योजनेतून कोट्यवधी गरजुंना मोफत उपचार सुविधा, चांद्रयान ३ च्या माध्यमातून अंतराळात झेप, तिहेरी तलाक रद्द, महिलांना सैन्यात संधी, पीएम आवास योजना आदी उपक्रम राबविले. पीएम किसान योजनेतून ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला.
या सर्व कामांची माहिती जनतेला देण्याबरोबरच पुढील महिनाभर भाजपतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात ५ जून पर्यावरण दिन ते युवा सन्मानापर्यंत होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, नगरसेवक व शहर मंडल प्रमुख शशिकांत मोदी, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू आदी उपस्थित होते.
आमदार आपल्या दारी....
चिपळुणातील सैनिक संकूल उभारणीबाबत आ. जठार म्हणाले की, चिपळुणात या संकुलाची गरज आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे चर्चा व मंजुरी झाली होती. कोकणात मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत. असे असताना हे संकूल सातारा येथे नेण्यात आले. यापूर्वी सातारा येथे संकूल असतानाही पुन्हा नेण्यात आले. आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील महिन्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला प्रत्येक तालुक्यात 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार आहोत.