म्हसळा; श्रीकांत बिरवाडकर : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणात खाडी किनाऱ्याजवळ राहणारे लोक मच्छीमारी व्यवसायासोबत वेगवेगळ्या प्रकारची शेती, फळबाग झाडांची लागवड करीत आहेत. म्हसळा तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांनी देखील त्यांचे शेतीमध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा प्रकारची फळझाडे लागवड केलेली आहे. त्यातून भरपूर प्रमाणात उत्पादन केले जाते. परंतु, उत्पादित केलेल्या मालाला त्यांना स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पादित केलेला माल मुंबई किंवा पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन विकावा लागत आहे. या सर्व प्रकारामध्ये शेतकरी व बागायतदार यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय व हेळसांड होत असल्याने भविष्यात शेतीवर आधारित उद्योग, व्यवसाय व फळप्रक्रिया उद्योग मतदारसंघात आणण्याचे दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. त्यानी तळवडे, आडी, तोराडी बंडवाडी येथील विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.
मागील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात या भागातील नागरिकांचे राहते घरासाहित शेती व फळबागांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांच्यासोबत तालुक्यातील काही भागांची पाहणी केली आणि सरसकट पंचनामे करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भरीव मदत करून येथील जनतेला दिलासा देण्याचे काम करता आले याचे समाधान आहे, असे सांगून भविष्यात प्रदूषण विरहित कारखाने आणणार असून या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. आणि मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबविण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. असे अश्वासित केले.
तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेबांच्या काळात बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाचे नव्याने बांधकाम केले जाईल असे सांगून आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविला पाहिजे अशी विनंती खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना केली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत जिल्हा चिटणीस महादेवराव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती बबन मनवे, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, पंचक्रोशीचे मुंबई अध्यक्ष दामोदरजी विचारे, ग्रामीण अध्यक्ष किसनराव पालांडे, उपाध्यक्ष शशिकांत डिंगणकर, सचिव आयु. एन. के .जाधव, वरवठणे गण अध्यक्ष सतिश शिगवण, युवाध्यक्ष किरण पालांडे, आडी सरपंच म्हसकर, नळपाणी योजनेचे अध्यक्ष सदानंद (अप्पा) विचारे, सचिव महेंद्र विचारे, कोंझरी मराठा मंडळाचे मार्गदर्शक बळीराम विचारे, मंडळाचे अध्यक्ष अमित विचारे, सुमित विचारे, निषाद विचारे, उदय विचारे, बशीर मुसाभाई, इरफान पेवेकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला तरुण वर्ग, मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हसळा तालुक्यातील जनजीवन मिशन योजना अंतर्गत कोंझरी, तळवडे, कुंभळे या गावांसाठी मंजूर असलेल्या सुमारे एक कोटी ३७ लक्ष १२ हजार रुपये खर्चाचे नळपाणी योजना, बंडवाडी नळपाणी योजना सुमारे ५१ लक्ष २३ हजार, आडी म. खाडी नळपाणी योजना ४६ लक्ष ६६ हजार मंजूर खर्चाचे नळपाणी योजनांचे भूमिपूजन व आडी ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.
हेही वाचलंत का?