Ramai Gharkul Yojana Scam Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातींसाठी असलेल्या ‘रमाई घरकुल योजने’त मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, बनावट रेशनकार्ड तयार करून या योजनेतील निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे.
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरही सहजपणे बनावट रेशनकार्ड तयार होऊ शकतं, अशी परिस्थिती असल्याचे या प्रकरणातून दिसून येतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातींसाठी असलेल्या घरकुल योजनेतील कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला जात आहे.
हा कथित घोटाळा ‘रमाई घरकुल योजने’ अंतर्गत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही योजना अनुसूचित जातीतील गरजू कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते. मात्र या योजनेचा गैरवापर करून काही जणांनी आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जलील यांच्या पोस्टनुसार, या प्रकरणात काही स्वयंघोषित दलित नेते तसेच समाज कल्याण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्फत बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी निधी काढण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या आरोपांमुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जलील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.