वडीगोद्री : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे ८०० पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या सर्वांना उद्या (दि.१७) तातडीने अंतरवाली सराटीत बोलावले आहे. उद्या सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या सर्व इच्छुकांना निवडणुकीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर रविवारी (दि. २०) अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच लढायचं की पाडायचं याचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि. १६) येथे दिली. (Maharashtra Assembly Elections 2024)
ते पुढे म्हणाले की, या बैठकीत समाजाचा जो निर्णय होईल, त्यास माझा पाठिंबा असेल. मी माघारी घेणार नाही. या बैठकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे, हा निर्णय घेण्यात येईल. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही बैठक होईल.
आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही. सातारा, बॉम्बे आणि हैदराबाद गॅझेट लागू केले नाही. यात आमचा काय फायदा झाला, असा सवाल जरांगे केला. आम्हाला म्हणाले मराठा आरक्षण हवे असेल, तर महाविकास आघाडीकडून लिहून आणा. मग आता १५ जाती ओबीसींमध्ये घेतल्या गेल्या, हा आमचा फायदा आहे का? एसईबीसी आरक्षण आम्हाला नको होते, ते लादले गेले. आता ईडब्ल्यूएस बंद केले आहे. आमच्या मराठा आंदोलकांनी शेकडो बलिदान दिले, हा आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती जरांगे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला धोका दिला, असे मी म्हणणार नाही, पण आम्हाला आरक्षण मिळाले नाही. मराठ्यांना फक्त शिंदे आरक्षण देऊ शकतात, हे मी नेहमी म्हणत आलो आहे. पण त्यांना कोण काम करू देत नाही, हे काही कळत नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे कोणतेही ओबीसी नाहीत. दिल्लीला दाखवण्यासाठी तुम्ही ही खोटी घोषणा आणि अंमलबजावणी केली, ही गरिबांची लाट आहे, आमची बैठक होऊ द्या, मग कोण कुणाच्या बाजूने हे तुम्हाला दिसेल,असा इशारा त्यांनी दिला.