वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण व अन्य मागण्यांबाबत शासन अनुकूल निर्णय घेईल, असा विश्वास आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी (दि.१४) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाली नाही, याबाबत प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन शासनाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्याशिवाय ते आचारसंहिता लावणार नाहीत. नारायण गडावरचा दसरा मेळावा बघून त्यांचे डोळे उघडले असतील. मी शंभर टक्के सांगतो ते कॅबिनेट घेणार आहेत. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहेत. मराठ्यांवर ते अन्याय करणार नाहीत, असे जरांगे म्हणाले.
ज्यांची मागणी नाही त्या पंधरा जातींना मराठ्यांच्या नाकावर टिचून आरक्षण दिले. भाजप, शिवसेना, काँगेस आणि शिवसेना यांच्याविरोधात मराठा गेला आहे. आरक्षण दिले नाही तर यांचे पूर्ण उमेदवार पाडतो. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सांगतो की, आम्हाला राजकारण करायचे नाही, खुर्चा तुम्हीच सांभाळा. तुमची मजा तुम्हीच करा. मराठ्यांच्या विरोधात फडवणीस यांनी जाऊ नये. नाही तर मराठा समाज तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी पुन्हा दिला.