टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून येथे भर दुपारी 12 वाजता खोडवा ऊसात गवत खात असलेल्या शेळ्यांच्या कळपातील सुमारे 12 शेळ्या व बकरांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 5 शेळ्या मृत झाल्या आहेत. तर 4 शेळ्यांची प्रकृती अत्यवस्थ असून 3 शेळ्या गायब झाल्या आहेत. टाकळीभान येथे बिबट्याचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.
टाकळीभान शिवारातील गट नंबर 316 मध्ये काकासाहेब विनायक डिके यांचे कुटुंब शेतात वस्ती करुन वास्तव्यास आहे. काकासाहेब यांचे बंधू भास्करराव हे नेहमीप्रमाणे आपला सुमारे 24 शेळ्यांचा कळप घेवून शेजारीच आसलेल्या गट नंबर 323 मध्ये आसलेल्या खोडवा उसात शेळ्या चारीत होते. खोडवा उसाचे पीक छातीभर वाढलेले असल्याने भास्कर डिके हे बांधावरील झाडाखाली बसून शेळ्यांवर लक्ष ठेवून होते.
दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेळ्यांचा अचानक या उसातून शेळ्या ओरडण्याचा आवाज आला. तर काही शेळ्या उसातुन सैरभैर बाहेर पळत आल्या व शेजारीच आसलेल्या घराच्या दिशेने धावत सुटल्या. भास्करराव यांना ऊसात बिबट्या आला आसावा असा अंदाज करुन आरडाओरड केल्याने शेजारीच आसलेल्या वस्तीवरील कुटुंब या बाजूला धावले.
ऊस वाढलेला आसल्याने व बिबट्याच्या धास्तीने उसात शिरण्याचे कोणाचे धाडस होत नव्हते. ही बातमी शेजारच्या वस्त्यांवर पसरताच सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व धाडसाने उसात शिरुन शोधमोहीम सुरु केली. या मोहीमेत 5 शेळ्या ऊसातच मृत अवस्थेत मिळून आल्या तर 4 जखमी आवस्थेत सापडल्या. मात्र 3 शेळ्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नव्हता.
याबाबत वन विभागाचे कर्मचारी विकास पवार यांना तातडीने माहिती देण्यात आली. घटनेबाबत वन विभागाच्या वरीष्ठ आधिकारी प्रतिभा सोनवणे यांनाही भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात आले. पशुवैद्यकिय विभागालाही माहीती देण्यात आली आहे. परीसरात आजपर्यंतची ही सर्वात मोठी घटना घडली असून बिबट्याच्या भितीने परीसर भयभित झाला आहे.