अहमदनगर

नगर : पाण्याच्या वादातून कोयत्याने वार, गुन्हा दाखल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

नळाचे पाणी भरण्याची मोटार बंद केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या वादात कोयत्याने वार करण्यात आला. खलील सय्यद असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 7 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी भल्या सकाळीच चौपाटी कारंजा परिसरात ही घटना घडली. वसीम फारूख शेख, युसुफ फारूख शेख, कुदुस शेख, रेशमा वसीम शेख, यास्मीन युसुफ शेख, आशा फारूख शेख (सर्व रा.फरातखॉ मस्जिद चौपाटी कारंजा), आक्रम शेख (रा.मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या खलील सय्यद यांच्या पत्नी रेश्मा खलील सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख-सय्यद कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला. सय्यद कुटुंब हे वसिम फारूख शेख यांच्या मोटारने पाणी भरतात. दरम्यान बुधवार (दि.1) रोजी सकाळच्या सुमारास पिण्याचे पाणी भरावयाचे असल्याने मोटार का बंद केली अशी विचारणा खलील सय्यद यांनी रेशमा वसीम शेख यांना केली. त्यावरून खलील सय्यद व शेख कुटुंबियामध्ये वाद सुरू झाले. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले.

युसुफ शेख, आक्रम शेख, कुदुस शेख या तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. वसीम फारूख शेख याने कोयत्याने पाठीवर, कमरेवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खलील सय्यद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT