कर्जत : पुढारी वृत्तसेवा : अडीच वर्षांत कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेला स्वाभिमान गमावल्यासारखे वाटत होते. मात्र आता तशी वेळ पुन्हा येणार नाही, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर प्रा. आमदार राम शिंदे यांचे कर्जत शहरात आगमन झाले.
त्यावेळी त्यांचे अतिशय जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी तालुक्यात करण्यात आली होती. शहरात ठिक-ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते.कर्जत शहरातील मेनरोड कमळमय झाला होता.
आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. नंतर रस्त्यात ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले.
कर्जत शहरात येताच मिरवणूक काढण्यात आली. डिजे, हलगी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. भारतीय जनता पक्षाचे झेंडे फडकावत मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. कार्यकर्ते बेभान होऊन राम शिंदे यांचा जयघोष करत या मिरवणुकीमध्ये नाचताना दिसून आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भला मोठा हार क्रेनच्या सहाय्याने आमदार राम शिंदे यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष आणि घोषणाबाजी केली. मिरवणूक ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरामध्ये गेली. तेथे आमदार शिंदे यांनी दर्शन घेतले.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत कर्जत व जामखेड तालुक्यातील जनतेला स्वाभिमान गहाण ठेवला आहे, असे वाटत होते. परंतु गोदड महाराजांच्या आशीर्वादाने व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
मागील पाच वर्षांत ज्या पद्धतीने विकास कामे केली, तोच विकास कामांचा धडाका कायम ठेवू. गोदड महाराजांचे दर्शन घेण्यापूर्वी राज्याचे सरकार बरखास्त होण्याची वेळ आली आहे, एवढी शक्ती महाराजांमध्ये आहे. मागील अडीच वर्षांत सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान दुखावला गेला होता. पुढील काळात तो जपण्यासाठी निश्चितपणे काम करू, असे आमदार शिंदे म्हणाले.