अहमदनगर

नगर : कोपरगावला पावसाळ्यात पाणी टंचाई ; शहर तब्बल 10 दिवस निर्जळी

अमृता चौगुले

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारेने सध्या डाव्या कालव्याला पिण्याचे पाणी सोडले आहे, परंतु शहरात पाणी टंचाईमुळे महिलांसह नागरीक संतप्त झाले आहेत. या बिकट पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहराला आठवड्यातून एक दिवस होणारा पाणीपुरवठा पूर्ववत चार दिवसाआड तत्काळ सुरु करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे. शहरातील ओम नगर, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, गवारे नगर, शिंगी- शिंदे नगर, समता नगर, खडकी विद्यानगर, श्रीरामनगर, बँक कॉलनी परिसर या उपनगर भागात तब्बल दहा दिवस उलटले तरी अद्याप नगर पालिकेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नाही.

त्याचे देखील कोणीतरी श्रेय घ्यावे किंवा जबाबदारी घ्यावी. किमान तब्बल 8 दिवसांनी पाणी पुरवठा करतो, तो देखील वेळेवर करु शकत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय, असा संतप्त सवाल माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी केला आहे. पालिकेचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असताना नागरिकांना 8 दिवसातून एकदा पाणी मिळते. तसे नियोजन करून ठेवलेले असते. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांना याचे गांभीर्य नाही. किमान त्यांनी टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, असे कदम यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, 28 नोव्हेंबरला नगरपालिकेने डाव्या कालव्याची कामे करावयाचे असल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी उशिरा मिळणार असल्याचे पत्र आल्याचे सांगत, आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणी पुरवठा सुरु केला. गेल्या सात महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस पाणी येते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि आता जून महिना संपत आला आहे. विशेष असे की, कालवा दुरुस्तीचे काम केव्हाच पुर्ण झाले आहे, असे पाटील म्हणतात.

पाटबंधारे विभागाने पिण्यासाठी पाणी सध्या कालव्याला सोडले आहे, तरी नगरपालिकेने कालवा सुरू झाल्यानंतर व बंद होताना नगरपालिकेचा मंजूर पाणी कोठा शिल्लक राहतो, तो लक्ष देऊन भरून घ्यावा व नागरिकांना पाणी टंचाईच्या त्रासापासून दिलासा द्यावा. दोन महिन्यांपासून घाण दुर्गंधीयुक्त, गाळ, काळे क्षार, हिरवे, अस्वच्छ पाणी नागरिकांना देत आहे. खरेतर जलशुद्धीकरणाची काम झाले आहे, असे असताना नगरपालिका स्वच्छ पाणी का पुरवित नाही, याचा विचार जनतेने करायला हवा. दुसरीकडे येवला नगरपालिकेने तळे भरल्याने पाण्याचा एक दिवस कमी केला. श्रीरामपूर व संगमनेरला दररोज पाणी मिळते. राहाता, शिर्डीत टंचाई नाही. या पार्श्वभूमीवर कोपरगाव पालिकेने तळे भरण्यासह जलशुद्धीकरणाकडे लक्ष दिल्यास पाणी देता येईल. सात महिने कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी न मिळाल्याने पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT