अहमदनगर

‘त्या’ घंटागाड्यांचे चाक हलेना!

Sanket Limkar

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : भारत स्वच्छ अभियानांतर्गत राहुरी तालुक्यातील 36 गावांना विद्यूत घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान, अनेक गावांमध्ये घंटा गाडीचा वापर होत नसल्याचे विदारक चित्र आहे. 14 व 15 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या घंटागाड्यांची घंटाच वाजतच नसल्याने शासनाचा निधी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

राहुरी तालुक्यातील आरडगाव, बारागाव नांदूर, ब्राम्हणी, बाभूळगाव, चांदेगाव, चिंचाळे, चिंचविहीरे, धामोरी बु, धामोरी खुर्द, धानोरे, डिग्रस कनगर, कोल्हार खुर्द, गणेगाव, केंदळ बु, केंदळ खुर्द, कोंढवड, म्हैसगाव, मांजरी, मानोरी, निंभेरे, पाथरे खुर्द, पिंपरी अवघड, राहुरी खुर्द, सडे, सात्रळ, शिलेगाव, ताहाराबाद, सोनगाव, टाकळीमिया, तांभेरे, उंबरे, टाकळीमिया, तांदूळनेर, तिळापूर, वांबोरी या गावांना प्रत्येकी एक विद्यूत घंटागाडी देण्यात आली होती. बहुतेक गावांमध्ये मात्र विद्यूत घंटा गाड्यांची मोठी दुरवस्था झालचे दिसत आहे.

ज्या गावांमध्ये विद्यूत घंटागाडी कार्यान्वित आहे, त्या ठिकाणी गाडीला चालकच नसल्याचे चित्र आहे. तर काही गावांमध्ये गाड्यांची बॅटरी कार्यरत नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत राहुरी पंचायत समितीमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संभ्रम निर्माण करणारी माहिती मिळाली.

द्यावत माहिती घेऊः डमाळे

पंचायत समिती विभागाकडे 36 विद्यूत घंटा गाडी वापराची माहिती आहे. परंतु त्या गाड्यांच्या वापराबाबत पंचायत समितीमध्ये माहिती उपलब्ध नाही. ग्रामपंचायतींकडेच वापराची माहिती मिळेल. संबंधित घंटा गाड्यांबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागाचे लिपीक मनोहर डमाळे यांनी सांगितले.

समस्या जाणून घेऊ : शिंदे

बहुतेक गावांना विद्यूत घंटा गाड्या वाटप झाल्या. परंतु त्या वापराबाबत अडचणी असल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी समजून घेऊ. बॅटरी नादुरुस्ती किंवा गाडीबाबत इतर काही समस्या असल्यास गाडी वितरक कंपनीकडे तक्रार देऊ. संबंधित गाड्यांचा वापर चांगला होत असल्यास अजूनही विद्यूत गाड्या वाटप करू अशी माहिती गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली.

विद्यूत गाडी बंद : निमसे

टाकळीमिया ग्रामपंचायतीमध्ये विद्यूत गाडी बंद असलेल्या अवस्थेत दिसून आली. ग्रामविकास अधिकारी निमसे यांच्याशी चर्चा केली असता कंपनीकडे तक्रार केली असून दोन तीन दिवसात काम झाल्यानंतर कचरा संकलन सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT