अहमदनगर

Nagar : व्यापार्‍यांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या : आमदार संग्राम जगताप

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरात चोरीची घटना घडल्यावर आरोपींना तातडीने जेरबंद केल्यास पोलिसांचा वचक राहील. चोरीच्या घटना वारंवार घडणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. व्यापार्‍यांच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घ्याव्यात. शहरातील चितळेरोड, मंगलगेट, सराफ बाजार येथील पोलीस चौक्या तातडीने सुरू कराव्यात, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या.
शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत. पोलिस तपास वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे. यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. या याबाबत आमदार जगताप यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता.

संबंधित बातम्या :

त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी त्यांना लेखी पत्र देत उपोषण न करण्याची विनंती केली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार जगताप बोलत होते. आडते बाजार, दाळ मंडई येथील व्यापार्‍यांची बैठक घेऊन संवाद साधत तातडीने प्रश्न मार्गी लावा, असे त्यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक खैरे म्हणाले, पोलिस प्रशासन चोरी व दरोड्याच्या सर्व घटनांचा तपास गांभीर्याने लावत आहे. जिल्हा विस्ताराने मोठा असून, पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे 550 पोलिस भरतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. व्यापार्‍यांनी केवळ आपल्या दुकानांपुरते सीसीटीव्ही न लावता दुकानाबाहेर देखील लावावेत. आरोपी देखील तंत्रज्ञानाचा वापर करत चोर्‍या करत आहेत. मात्र, आम्ही त्यापुढे जाऊन आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद करत आहोत. मीरा मेडिकल येथील चोरीच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्यापार्‍यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील.

कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, आमदार जगताप यांच्या सूचनांनुसार शहरात कारवाई सुरू आहे. विना नंबरच्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. टवाळखोरांचा शोध घेण्यात येत असून, नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. व्यापार्‍यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तोफखान्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनीही व्यापार्‍यांशी संवाद साधला.

यावेळी व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, सतीश मैड, कमलेश भंडारी, गोपाळ मणियार, अजिंक्य बोरकर, विश्वनाथ कासट, शांतीलाल गांधी, सुशील भळगट, हिरालाल चोपडा, अजित भंडारी, सतीश गुंदेचा, शैलेश गांधी आदी उपस्थित होते.

बीट मार्शल पथक सुरू करा
पूर्वी नगर शहरात सुरू असलेले बीट मार्शल पथक पुन्हा सुरू करावे. त्यामुळे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचतील. पोलिसांकडे दुचाकी उपलब्ध नसल्यास लोकसहभागातून दुचाकी उपलब्ध होण्यासाठी कुठल्या कंपनीच्या गाड्या हव्यात, याचा सविस्तर प्रस्ताव द्या. शहर सुरक्षित ठेवण्यासाठी तो मंजूर करून आणू, असे ह आमदार जगताप म्हणाले.

SCROLL FOR NEXT