अहमदनगर

अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान द्या : आ. आशुतोष काळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. चालू वर्षीदेखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्यावे, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी मदत पुनर्वसन मंत्री संजय पाटील यांना घातले. आ. काळे यांनी मंत्री संजय पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

ते म्हणाले, गेल्यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुरेगाव व पोहेगाव मंडलातील अतिवृष्टीने 18323 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे 10716 शेतकर्‍यांना अनुदान मिळाले, परंतु अजून 7607 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. कोपरगाव, दहेगाव बोलका व रवंदे मंडलात 27200 शेतकर्‍यांचे सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. त्यांना देखील तातडीने नुकसान भरपाई अनुदान मिळणे गरजेचे आहे.

यावर्षी कोपरगाव मतदार संघात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. शेतकर्‍यांनी अत्यल्प पावसावर पेरण्या केल्या, मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे लवकर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना वर्षाच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावे, अशी मागणी आ. काळे यांनी केली. दरम्यान, या मागणीची मदत पुनर्वसन मंत्री संजय पाटील यांनी गंभीरपणे दखल घेवून लवकरात लवकर अनुदान देणार असल्याची ग्वाही दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT