कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : एस.एस.जी.एम.कॉलेजने नॅकचे 3 सर्कल पूर्ण केले. महाविद्यालय आता 4 थ्या सर्कलची प्रक्रिया राबवून प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या दारी शिक्षणाची गंगोत्री आणण्यास अपार कष्ट सोसले. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण मिळावे, यासाठी स्वामी सहजानंद भारती, माजी खा. स्व. शंकरराव काळे, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे व डॉ. सी. एम. मेहता यांनी 1963 सालामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज सायन्स, कॉमर्स आणि आर्ट महाविद्यालय सुरू करून विशाल दूरदृष्टीकोन ठेवला.
आज हे महाविद्यालय डिजिटल तंत्रज्ञान अत्याधुनिक शिक्षण पद्धतीच्या रूपाने अभिमानाने कात टाकत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या भूमिकेतून प्रत्येक महाविद्यालयाने नॅक करून घेणे बंधनकारक केले. यानुसार (दि. 30 व 31 ऑगस्ट) रोजी भेट देणार्या नॅक कमिटीला सामोरे जाण्यास महाविद्यालय सज्ज आहे.
रंगरंगोटी, हिरवागार वनराईने नटलेला परिसर व प्रसन्न वातावरणामुळे महाविद्यालयाचा परिसर खुलला आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग व घटकांनी गेली 5 वर्षे विविध निरंतर अंतर्गत मूल्यमापन, वाचन प्रेरणा दिन, वृक्षरोपण, भित्तीपत्रक, शैक्षणिक सहल, राष्ट्रीय चर्चासत्र व कार्यशाळा, विविध स्पर्धा, कर्मवीर विद्या प्रबोधिनी असे उपक्रम राबवून आपली गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी, पाण्यासाठी प्युरिफायर, उपहार गृह, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अद्ययावत वसतिगृह सर्व सोयींनीयुक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व निरंतर अभ्यासिका अशा भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. इ. टी. पी. प्लॅन्ट, कंपोस्ट खत निर्मिती. जैव गॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्पोर्ट्स कॅम्पस अपंगासाठी रॅम, असेंबली पॉईंट, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य केंद्र, संपूर्ण परिसर सीसीटीव्हीने सज्ज केला. दोन लेडीज होस्टेल, जनरेटर ची सुविधा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन, कर्मवीर दालन, फायर सेफ्टी, अग्निरोधक, योगा सेंटर, गोल गार्डन परिसर, अतिथी गृह, अद्ययावत जिमखाना इ. प्रकल्प महाविद्यालयात राबविले जात आहेत.
शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात 'शिक्षक आपल्या दारी', 'एन.सी.सी., 'एन.एस.एस.', 'विद्यार्थी कल्याण मंडळ', 'कमवा व शिका योजना व त्या अंतर्गत कै. सुशिलामाई शंकरराव काळे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होतात. यासाठी रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे यांनी मार्गदर्शन केल्याचे प्राचार्य डॉ. रमेश सानप, नॅक समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, प्रा. डॉ. मोहन सांगळे म्हणाले.
हेही वाचा