अहमदनगर

अहमदनगर : अनधिकृत पत्राशेड काढून टाका : आ. जगताप

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पारिजात चौकातील पत्र्याच्या शेडमधील दुकानांना आग लागून दुकाने भस्मसात झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठे आर्थिक नुकसान झाले. पत्राशेडमध्ये आपत्कालीन कोणतीही उपाययोजना केली नसल्याने शहरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. महापालिकेने अनधिकृत पत्राशेड काढून टाकावेत. अन्यथा यापुढे अशा घटना घडल्यास प्रशासन म्हणून आयुक्तांवर गुन्हा दाखल करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नगर शहरातील पारिजात चौक येथील दुकानांना आग लागून झालेल्या नुकसानीची आ. संग्राम जगताप यांनी पाहणी केली. याप्रसंगी अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, अजिंक्य बोरकर, निखील वारे, अमोल गाडे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, अनधिकृत पत्राशेडमुळे भाडेकरू दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

आपत्कालीन उपाययोजनांअभावी येथे दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी मनपा प्रशासनाने शहरातील अनधिकृत पत्र्याच्या शेडवर कारवाई करावी. नागरिकांनी आपत्कालीन संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करून पत्र्याचे शेड उभारण्यासाठी मनपाकडून अधिकृत परवानगी घ्यावी, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT