नान्नज : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे एकास तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तलवारीचा वार हुकविल्याने या हल्ल्यात तो बालंबाल वाचल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जामखेड पोलिसात आर्मक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या दोन आरोपींना जामखेड न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव विजय साबळे व नीलेश माने दि. 9 जून रोजी नान्नज येथील घरासमोर उभे होते. यावेळी आरोपी बाबा उर्फ इस्माईल मेहबूब शेख (रा. नान्नज), बाबू महिपती कुमटकर (रा. राजेवाडी) व लक्ष्मण महादेव काटे (रा. नान्नज) या तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच याच दिवशी रात्री नऊ वाजता आरोपी बाबा उर्फ इस्माईल मेहबूब शेख याने तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला .मात्र, तलवारीचा वार हुकविल्याने वैभव साबळे बालंबाल बचावला.
याप्रकरणी वैभव विजय साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात जामखेड पोलिसात आर्म क्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिलराव भारती हे करीत आहेत. शनिवार रोजी या मधील दोन्ही आरोपींना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांची अशीही तत्परता
तालुक्यात आजपर्यंत अनेक गुन्हे घडले. मात्र, त्यामधील आरोपींना अटक करण्याची तसदी पोलिसांनी घेतली गेली नव्हती. नान्नजच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी मोठी तत्परता दाखवली. गुन्हा दाखल करण्यापूर्वी चार तास आधी आरोपींना ताब्यात घेतले होते. घटनेच्या दुसर्या दिवशी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याने गावात उलट-सुलट चर्चा आहे.