पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रविवारी दुपारी वादळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. आमदार लंके यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले की, रविवारी दुपारी तालुक्यातील पारनेर, पानोली, सांगवी सूर्या, जवळा, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजी भोयरे, जातेगांव, म्हसणे, सुलतानपूर, गटेवाडी, पठारवाडी, लोणी मावळा या गावांमध्ये वादळी पावससह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले.
संबंधित बातम्या :
पारनेर-नगर मतदारसंघात जुन-जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला.त्यानंतर काही गावांमध्ये शेतकर्यानी जेमतेम पावसावरच रब्बीच्या पेरण्या केल्या. या पिकांचे जोमाच असतानाच अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे मोठी नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, केळी, बोर फळबागांचेहीे प्रचंड नुकसान झाले, याकडे आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, प्रांताधिकारी गणेश राठोड, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनाही पत्र पाठवून आमदार लंके यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले.
लंके, भालेकर यांच्याकडून पाहणी
वादळी वाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची आमदार नीलेश लंके यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते दीपक लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी रविवारी सायंकाळी शेतकर्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार लंके प्रयत्नशिल असल्याची ग्वाही त्यांनी शेतकर्यांना दिली.