जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. यामुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणा दरम्यान मराठा क्रांती मोर्चा व नाहुली ग्रामस्थांनी भुजबळ यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून व जोडे मारत निषेध केला.
ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत भुजबळ यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल करीत टीकास्त्र सोडले. तसेच, जरांगे यांच्या विरोधात भरसभेत बेताल वक्तव्य केले. जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात काल पंचवीसाव्या दिवशी नाहुली येथील मराठा बांधव व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून, जोडे मारो आंदोलन केले.
संभाजीराजे यांनी भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी मागणी केली आहे. राज्यातील मराठा बांधवांकडूनही भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावेळी सरपंच सचिन घुमरे, विजय मोरे, नितीन घुमरे, भिमराव बहीर, देवराव जाधव, सुरेश बहीर, राजेश बहीर, माऊली बहीर, आण्णासाहेब बहीर, विश्वजित घुमरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होत.
हेही वाचा