अहमदनगर

Nagar News : तिसगावमधील अतिक्रमणे लवकरच हटणार

Laxman Dhenge

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट 296 वरील अतिक्रमणधारकांवर 150 दिवसांत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (छत्रपती संभाजीनगर) पाथर्डीच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार समितीने 270 जणांना नोटिसा बजावून जागेच्या हक्काबाबत पुरावे मागविले आहेत. गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी अतिक्रमणे झालेल्या जागेची पाहणी केल्याने अतिक्रमणधारकांत खळबळ उडाली आहे.

तिसगाव येथील गट न.296 मध्ये सरकारी जागा आहे. तेथे 270 जणांनी अतिक्रमण केली असून, काही जागा तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना दिल्या आहेत. मात्र, तेथे पक्की बांधकामे केल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक बारवेवर घरे बांधली आहेत. कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीच्या 20 गुंठे जागेवरही अतिक्रमणे झाली आहेत. ग्रामपंचायतीने 36 बांधकामे करून ही जागा भाडेतत्त्वावर दिली होती. यासंदर्भात वाल्मीक गारुडकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेची सुनावणी होऊन न्यायालयाने पाथर्डीच्या गटविकास अधिकार्‍यांना गेल्या 27 सप्टेंबरला 150 दिवसांत अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तिसगावातील 270 अतिक्रमणधारकांना गेल्या 12 ऑक्टोबरला नोटिसा बजावल्यात आल्या असून जागेसंबधी हक्काचे पुरावे सादर करण्याबाबत कळविले आहे. या नोटिशींना काहींनी उत्तरे दिली आहेत. गेल्या 8 नोव्हेंबरला ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणी करून अहवाल देण्याची मागणी केली होती. अतिक्रमणधारकांनी दिलेली सर्व कागदपत्रे पडताळणी करून त्याबाबतचा स्वंयस्पष्ट अहवाल देण्याचे गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी सरकारची बाजू मांडणारे अ‍ॅड. पुंजाराम शिंदे व अ‍ॅड. महादेव आठरे यांना कळविेले आहे.

तिसगाव येथील 270 अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या असून, त्यांचे खुलासे आले आहेत. त्याची पडताळणी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहे.

डॉ.जगदीश पालवे, गटविकास अधिकारी, पाथर्डी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT