अहमदनगर

अहमदनगर : पत्नी, भाऊ अन् पुतण्याने केली हत्या

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत घरच्यांना कायम त्रास देणार्‍या पतीला पत्नी, भाऊ व पुतण्याने संपविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मनोज किशोर गोसावी, सौरभ मनोज गोसावी व अनिता बाबासाहेब ऊर्फ गणेश गोसावी (सर्व रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. लोणी व्यंकनाथ शिवारात 25 सप्टेंबरला एक चेहरा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मृतदेह हा सुकेवाडी (ता.संगमनेर) येथील बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी याचा असल्याची खात्री झाली. त्यानंतर पथकाने कुटुंबियांची कसून चौकशी केली.

मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज या दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मनोज गोसावी याची आणखी विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत बाबासाहेब हा दारू पिऊन कुटुंंबियांना मारहाण करून सारखा त्रास देत होता. बाबासाहेब याला दारू जास्त झाल्याने त्याला 'दवाखान्यात जायचे आहे', असे सांगून स्विफ्ट गाडीत बसविले व रस्त्याने जाताना त्याचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.

पेट्रोल टाकून चेहरा जाळला

मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी वाहनाचे सीट कव्हर व पेट्रोल चेहर्‍यावर टाकून पेटवून दिले होते. त्यानंतर मृतदेह लोणी व्यंकनाथ शिवारात फेकून दिला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT