लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : निळवंडे धरण कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीच्या कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात केलेला उल्लेख उत्साह वाढविणारा क्षण' असल्याची भावना महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 102 वा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील इतर भागातील विषयांवर भाष्य करताना महाराष्ट्रातील निळवंडे डॅमचा उल्लेख केल्याने उपस्थित सर्वजण आवाक झाले. या कार्यक्रमाचे फोटो देखील त्यांनी संवादरुपी कार्यक्रमात दाखवल्याने सर्वांनीच टाळ्या वाजवून या क्षणाचा आनंद द्विगुणीत केला.
कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या प्रकल्पाच्या उद्घाटनास पंतप्रधानानी यावे, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निमंत्रण दिले आहे. उद्घटनापूर्वी पाणी सोडण्याची चाचणी सुध्दा सात दिवसात यशस्वी झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधानाची भावना आहे.
गावागावात पाणी आल्याचा आनंद शेतकर्यांनी दसरा, दिवाळी प्रमाणे साजरा केला.या आनंदाच्या क्षणाची दखल पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमातून घेतल्याचा व्यक्तिशा मला मोठा आनंद आहेच, परंतू यापेक्षाही याप्रकल्पाची उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी उत्साह वाढविणारी ही घटना आहे.
हेही वाचा