अहमदनगर

नगर : दूध दरप्रश्नी सहकारी, खासगी संघांची बैठक घेणार : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अमृता चौगुले

लोणी ( नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  लम्पी आजारात राज्यातील सर्व पशुधनांचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र राज्य एकमेव आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी व खासगी दूध संघांची एकत्र बैठक घेणार आहे, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकर्‍यांना आपण वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.
'शासन आपल्या दारी' उपक्रमा अंतर्गत मंत्री विखे पा. यांनी आज (रविवारी) कनकुरी, नादुर्खी खुर्द व बुद्रूक गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन योजनांची माहिती देत नागरीकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तातडीने उपाय-योजना करण्याच्या सुचना त्यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना केल्या.

मंत्री विखे पा. म्हणाले, या उपक्रमांतर्गत आज दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपली भेट घेवून दर कमी झाल्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी लवकरचं सहकारी, खासगी दूध संघांसह पशु खाद्याचे उत्पादक करणार्‍या कंपन्यांची एकत्र बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करुन, मंत्री विखे पा. म्हणाले, राज्यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्यांची जनावरे दगावली त्यांना आर्थिक मदत सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने सर्वच समाजातील घटकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या निर्णयांचा लाभ सामान्य माणसाला होत आहे की नाही, याचाही आढावा घेतला जात आहे. गावातील समस्या सुटण्यास हा उपक्रम महत्वपूर्ण ठरल्याचे ते म्हणाले. शिर्डीसह परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हाच आपला प्रयत्न आहे. येत्या काळात शेती महामंडळाच्या जमिनींचा विनीयोग औद्योगिक कंपन्या उभारण्यास करण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

'गणेश' मध्ये पाहुण्या-रावळ्यांचे फक्त राजकारण !
गणेश कारखाना निवडणूकी संदर्भात भाष्य करताना मंत्री विखे पा. म्हणाले, कारखान्याबद्दल यांना एवढी आपुलकी होती तर आठ वर्षांपुर्वीचं चालविण्यास का घेतला नाही? आज सर्व दु:खीत एकत्रित आले आहेत, परंतु कारखाना कोण चालविणार, हे सांगायला ते तयार नाहीत. यापुर्वीसुद्धा कोणता तरी पॅटर्न त्यांनी आणला होता. यामध्ये कामगारांना पगार कमी दिले. ऊस उत्पादक सभासदांचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे आलेल्या पाहुण्या- रावळ्यांना फक्त राजकारण करायचे आहे. गणेश कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी राज्य सरकारची मदत होणार असल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT