नगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली ते मुंबई असा पायी मोर्चा घेऊन निघालेले मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आज नगर जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी रात्री नगर शहराजवळ बाराबाभळी येथील मुक्कामाच्या ठिकाणी स्वागतासाठी आलेला व मोर्चातील असा सुमारे पाच लाखांचा जमाव असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुक्कामाच्या ठिकाणी जिल्ह्यातून कोट्यवधी भाकरी, आमटी, भाजी, ठेचा, खिचडी असा मेनू मोर्चेकरांसाठी जमा झाला होता.
पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथे दुपारचे जेवण घेऊन मोर्चा रात्रीच्या जेवणासाठी बाराबाभळी (अहमदनगर) येथे पोहोचला. येथे लाखो मोर्चेकर्यांच्या जेवणाची तगडी व्यवस्था करण्यात आली होती. नगर तालुका व जिल्ह्यातील गावोगावांतील घराघरातून आलेल्या कोट्यवधी भाकरी, आमटी, वांग्याची भाजी, पुलाव, भात अशी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सातपासून जेवणाला सुरुवात झाली. मोर्चामधील तरुण जसजसे बाराबाभळी येथे येत, तसतसे त्यांना जेवण देण्यात येत होते.
नगर परिसरातील प्रत्येक गावांनी मोर्चाच्या मुक्कामस्थळी स्टॉल लावून जेवणाची व्यवस्था केली होती. गावागावातील कुटुंबांनी भाकरी व अन्य शिधा एकत्रित आणला. त्यामुळे या मोर्चाला जात आणि धर्माचे बंधन नसल्याचे दिसून आले.
मोर्चात आलेल्या सर्व मराठा बांधवांनी भगवी टोपी आणि भगवा पांचाळ हे विशेष आकर्षण होते. हम सब जरांगे, लढेंगे जितेंगे, असे लिहिलेले टी शर्ट तरुणांनी घातले होते.
आज (रविवारी) एकादशी असल्याने उपवास असलेल्या मोर्चेकर्यांसाठी सुमारे दहा क्विंटलची साबुदाना खिचडीही बनविण्यात आली होती.
सोमवारी सफरचंदाचा नाश्ता देण्यात येणार असून, अहमदनगर शहर वकील संघटनेतर्फे अडीच टन सफरचंद मागविले आहेत.
हेही वाचा