नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजविणारा लम्पी आता काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत लम्पीने 26 जनावरांचा बळी घेतला असला, तरी जनावरे बरे होण्याचे प्रमाण 68 टक्के आहे. मृत जनावरांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडे सांगत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या वर्षी लम्पीची दुसरी लाट सुरू झाली होती. सुरुवातीला लम्पीमुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते.
त्यामुळे पशुसंवर्धन विभागासह शेतकरीदेखील सावध झाले होते. गोठा स्वच्छता, त्यासाठीची फवारणी, लसीकरण यावर भर देण्यात आला होता. गेल्या सोमवारी (4 सप्टेंबर) जिल्ह्यात 186 जनावरे मृत झाली होती. मंगळवारच्या अहवालानुसार 212 जनावरे मृत झाली आहेत. त्यामुळे या आठवड्यात केवळ 26 जनावरे लम्पीने दगावल्याचे पुढे आले. अर्थात ही आकडेवारी कमी असली तरी तितकीच चिंता आजही कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात पशुसंवर्धन विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यामुळे जनावरांचे बरे होण्याचे प्रमाणे 68 टक्के झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
हे ही वाचा :