अहमदनगर

Loksabha election | तालुक्यातील मतदारांचा कौल कुणाला? शेतकर्‍यांमध्ये नाराजी

Laxman Dhenge

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला असून, येथील मतदारांचा लोकसभा निवडणुकीत कौल कुणाला, याबाबत अनेक चर्चा झडत आहेत. प्रत्येक जण आपापल्यापरीने आकडेमोड करून विजयाचे गणित मांडत आहे. तालुका संपूर्णतः नगर शहराच्या चोहोबाजूंनी विखुरलेला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणाचा तालुक्यात परिणाम होत असल्याचे दिसून येते. 110 महसुली गावे असणार्‍या नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात. अनेक तरुण कामासाठी शहर, तसेच एमआयडीसीत आहेत. कमी पर्जन्य छायेचा भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या तालुक्यातील शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत नाही. येथील शेती पावसाच्या भरवशावर अवलंबून. तालुक्यातील मातब्बर नेते लोकसभेच्या प्रचारात सक्रिय दिसले. मात्र, गावपुढारी वगळता ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उदासीनताच दिसून आली. परंतु मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला आहे.

दुष्काळी परिस्थिती आणि सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात, कांदानिर्यात बंदी, दुधाला भाव नाही, यामुळे शेतकर्‍यांत प्रचंड नाराजी दिसून आली. मराठा आरक्षणाचा मुद्दाही निवडणूक काळात सोशल मीडियावर चांगलाच गाजत होता. शेतकर्‍यांची नाराजी, मराठा आरक्षण अन् स्थानिक मुद्यांभोवतीच निवडणुकीचा प्रचार फिरत होता. प्रथमतः लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय, देशहिताचे मुद्दे बाजूला राहिले. स्थानिक पातळीवरील निवडणुकीप्रमाणे मुद्दे मतदारांमध्ये दिसून आले. तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत, सोसायटींवर कर्डिले गटांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मात्र मतदार वेगवेगळी भूमिका घेताना दिसून येत असतात.
खासदार सुजय विखे यांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावरच होती.

तालुक्यात नेहमीच कर्डिले विरोधात महाविकास आघाडी असेच समीकरण बनलेले आहे. तरी देखील बाजार समिती निवडणूक, खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायत, सोसायट्यांमध्ये कर्डिले बाजी मारत असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यात 'सोधा' पक्षाचाही परिणाम दिसून येतो. कर्डिले-कोतकर-जगताप यांनी विखे यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तालुक्यातील बडे नेते विखे यांच्या प्रचारात सक्रिय दिसले. त्याचा किती परिणाम मतदानावर झाला, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. माजी आमदार नीलेश लंके यांनी तर निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासूनच जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आघाडी घेतली होती. सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार अशी ओळख निर्माण करण्यात लंके यांचे कार्यकर्ते यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळाले. कोरोना काळातील सहानुभूती लंके यांच्या पाठीशी होतीच. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले, गोविंद मोकाटे यांच्यासारख्या नेत्यांनी लंके यांना आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

भाजपला निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर निवडणूक नेण्यास अपयश आल्याचे दिसून आले. दहशत, गुंडगिरी, वाळूमाफिया याच मुद्यावर जोर देण्यात आल्याचे पहावयास मिळाले. लंके यांना त्यांच्याच पारनेर तालुक्यात शह देण्यासाठीच जास्त ताकद खर्ची करावी लागली. तालुका श्रीगोंदा, पारनेर, राहुरी मतदार संघात विभागला असला तरी विखे यांची संपूर्णतःमदार कर्डिले यांच्यावरच होती. लंके यांची जबाबदारी शशिकांत गाडे यांनी सांभाळली. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःच्या तालुक्यातच जास्त लक्ष दिल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागात केंद्र सरकारवर शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून आले. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. लंके हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांना चांगलीच सहानुभूती मिळाल्याचे चित्र तालुक्यात होते. खासदार विखे यांचे विकासकामे, तसेच सक्रिय राजकारणात नसलेल्या पण शांततेत मतदान करणारा मोठा वर्ग यांनी काय भूमिका घेतली, यावरच सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. निवडणुकीत खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT