अहमदनगर

अखेर कोपरगावला मिळणार पाणी; पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडले

Laxman Dhenge

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील धरणातून यंदाचे पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी तालुक्यातील येसगाव येथील साठवण तलावात पोहोचले आहे. साठवण तलाव भरण्यास किमान तीन- चार दिवस लागतील. विशेष असे की, गेल्या दहा- बारा दिवसातून होणारा पाणी पुरवठा बुधवारी तब्बल चौदा दिवसांनंतरही झाला नव्हता. शहराला आता एक दिवस उशीरा पाणी पुरवठा केला जाणार आहे, असा खुलासा नगर पालिकेचे उप मुख्य अधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी केला आहे.
दहा दिवसांनी होणारा पाणी पुरवठा नगरपालिका जल कुंभात बिघाड झाल्याने एक- दोन दिवस उशीरा करण्यात आला. यामुळे कोपरगावकरांचे पाणी न मिळाल्याने मोठे हाल झाले. काही भागात तर अक्षरशः गटारीचे पाणी नळांद्वारे देण्यात आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा काहीसा प्रकार पहावास मिळाला.

पालिकेच्या कारभाराची उडविली खिल्ली!

जगातील अनेक मोठ्या लोकांसह क्रीडापटू 'ब्लॅक वॉटर' पितात. त्याची किंमत बाजारात जास्त असते, पण आता कोपरगावमध्ये 'ब्लॅक वॉटर'ला पर्याय म्हणून नगरपालिका ब्राऊन वॉटर (तपकीरी गढूळ पाणी) देत आहे… आणि हे पाणी अगदी माफक दरात दर 10/12 दिवसांनी आपल्याला घरपोहच नळांमार्फत येईल, याची नोंद घ्यावी, कृपया पाणी जपून वापरा. जगात अशी सुविधा देणारी कोपरगाव न. पा. एकुलती एक संस्था आहे. कोण म्हणतो, पाण्याला रंग नसतो? कोपरगावला येऊन बघा, पिण्याच्या पाण्याला तपकीरी रंग असतो, अशा आशयाची पोस्ट सोशल मिडियावर टाकून कोपरगाव पालिकेची खिल्ली उडविण्यात आली, हे विशेष!

हेही वाचा

SCROLL FOR NEXT