अहमदनगर

क्षेत्रफळाच्या बरोबरीने वाढले गुन्हे! वर्षभरात 14077 गुन्हे

Laxman Dhenge

नगर : राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा असलेला जिल्हा अशी अहमदनगरची ओळख असली तरी ती आता बदलते की काय? अशी परिस्थिती निर्माण होवू पाहते आहे. गुन्हेगारीच्या आकडेमोडीत नगर राज्याच्या पटलावर झळकण्याची चिन्हे दृष्टीपथास येत आहेत. गत वर्षभरात तब्बल 14 हजार 77 विविध प्रकारचे गुन्हे घडले असून त्यातील 9 हजार 674 उघडकीस आले. उर्वरित गुन्हे 'तपासावर' आहेत.
खून, दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, अत्याचाराच्या घटना सर्रासपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरीता 33 पोलिस ठाणे आहेत.

या पोलिस ठाण्यातंर्गत आकडेवारी पाहता वर्षामध्ये गंभीर स्वरूपाचे सुमारे 14 हजार 77 गुन्हे दाखल झाले तर, त्यातील 9 हजार 674 गुन्हे उघडकीस आले. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे उघकीस येण्याचे प्रमाणही त्या तुलनेत चांगले, हाच काय तो दिलासा म्हणावा लागेल. राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे दुहेरी हत्याकांड, श्रीगोंदा तालुक्यात प्रियकरांच्या मदतीने पत्नीने पतीचा केलेला खून असे काही गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत उघडकीस आणले. याशिवाय जनावरे, शेतमाल चोरणारी टोळ्यांचाही पोलिसांनी पर्दाफाश केला. खून, दरोडा, बलात्कार अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

2023 मध्ये खुनाचे 105 गुन्हे घडले. त्यातील सुमारे 100 गुन्ह्यांची उकल होत आरोपींना अटकही झाली. पाच गुन्ह्याचा शोध मात्र अद्यापही सुरूच आहे. फसवणुकीचे 342 गुन्हे घडले. त्यातील केवळ 274 गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांंना यश मिळाले. तर, अपहराच्या 97 गुन्ह्यांनी पैकी 85 उघडकीस आणले. तर, गतवर्षांमध्ये चोरीचे 4 हजार 347 गुन्हे घडले. त्यापैकी एक हजार 62 गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होत असली तरी गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे.

दरम्यान, नगर शहरामध्ये धारदार शस्त्राने मारहाणीच्या घटना वाढत चालल्या आहेत. तर, काही घटनांमध्ये आरोपींनी पिस्तुलाचाही वापर केला आहे. क्षुल्लक कारणावरून गोळीबार केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याचे दिसून येते. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे खबर्‍याचे नेटवर्क कमी पडल्याची चर्चा आहे.

ग्रामसुरक्षा दल वार्‍यावर

गावोगाव ग्राम सुरक्षा दलाची निर्मिती करण्यात आली होती. ग्रामसुरक्षा दल मित्र म्हणून काम करीत होते. रात्रीच्यावेळी गावात गस्त घालणे, गावाचे संरक्षण असे काम ग्रामसुरक्षा दल करीत होते. परंतु, आता ग्रामसुरक्षा दलही वार्‍यावर असून, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. परिणामी शेमालाची चोरी, जनावरांची अशा घटना घडत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT