नगर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सरकार बदलल्यानंतर दीड वर्षात मराठा आरक्षणासंदर्भात समितीने एकही बैठक घेतली नाही. ही मराठा समाजाची अवहेलना आहे. सरकारच्या या भूमिकेमुळेच मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाचे आंदोलन पुढे आले असावे. या उपोषणकर्त्यांवरील लाठीमारालाही हेच सरकार जबाबदार असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
आमदार थोरात नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्यांनी शासनाला 40 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र मुळातच हे आंदोलन शासनाने दीड वर्ष समितीची बैठकच घेतली नसल्याने पुढे आले आहे. हे आंदोलन म्हणजे एक लोकमानस बनला आहे. यासाठी सरकारच जबाबदार असून, त्यांनी यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. तसेच धनगर आरक्षणाबाबतही शासनाने खोटे आश्वासन न देता चर्चेतून मार्ग काढावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली. ड्रग्ज प्रकरणातील दोषींना शिक्षा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजातील दोघांनी आरक्षणासाठी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. आरक्षणासाठी हा योग्य मार्ग नाही. महात्मा गांधींनी आपल्याला सत्याग्रहाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावरून चालून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे यापुढे मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन थोरात यांनी केले.
हेही वाचा