पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने मंगळवारी (दि.११) सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एन.एस.सी.आय वरळी-मुंबई येथे महापत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. आज (दि.१७) पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पोस्ट करत उत्तर द्या! म्हटलं आहे. (Maharashtra Politics)
उद्धवसाहेब जर पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष नव्हते, तर भाजपने २०१४ लोकसभा आणि २०१९ च्या दोन्ही निवडणूकांमध्ये पाठींबा का मागितला? अस लिहित एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, " उद्धवसाहेब पक्षाध्यक्ष नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा का करीत होते?, उद्धवसाहेबांच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना कसे दिले गेले?, उद्धवसाहेबांनी उमेदवारांना दिलेले एबी अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने कसे स्वीकारले?, शिंदेसह अन्य नेत्यांनी उद्धवसाहेबांनी दिलेली पदे कशी स्वीकारली?
भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,"दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला. तसेच नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते! मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता, अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही "महा"खोटं बोलला नसता, रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या "महा" शकुनीला आवरले असते, तर अशी "महा" पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!!जय श्रीराम!!"