रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय अनेकांना आहे. उठल्या उठल्या चहा पिल्याशिवाय डोळेच उघडत नाहीत, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हळूहळू नुकसानकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पचनशक्ती कमजोर होते, आम्लपित्त वाढते आणि शरीरात पोषक तत्त्वांचे शोषण नीट होत नाही.
रिकाम्या पोटी चहा पिल्यास गॅस, आम्लपित्त आणि पोट फुगण्याची समस्या वाढते. चहामधील कॅफिन पोटात आम्लनिर्मिती वाढवते, ज्यामुळे पचन बिघडते.
चहातील कॅफिन आयर्नचे शोषण कमी करते. त्यामुळे दीर्घकाळ रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांना अॅनिमिया किंवा रक्तातील कमतरता भासू शकते.
चहातील कॅफिन डाएयुरेटिक असते, ज्यामुळे शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे थकवा, कमजोरी आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.
जास्त चहा घेतल्याने स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. रिकाम्या पोटी घेतल्यास हा परिणाम अधिक तीव्र होतो. त्यामुळे चिडचिड, मूड स्विंग्स आणि झोप न लागणे यांसारख्या समस्या होतात.
रिकाम्या पोटी आणि जास्त चहा घेतल्यास दात पिवळसर होतात. दीर्घकाळ यामुळे हाडेही कमजोर होण्याचा धोका असतो.
चहा पिल्याने नैसर्गिक भूक लागत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. परिणामी पोषणतुटीची समस्या निर्माण होते.