मुंबई पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमा भागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एकवटत आपली ताकद दाखविली.
आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता आंदोलनाला प्रारंभ होणार असल्यामुळे सीमा भागातील विविध गावातून आलेल्या हजारो मराठी भाषिकांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच आझाद मैदानावर गर्दी केली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आझाद मैदान व्यापून टाकला. हातात भगवे ध्वज आणि कर्नाटकाच्या अन्यायविरोधात हातात फलक घेऊन हजारो मराठी जनता संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत होती.
सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. मैदानावर उभारलेला मंडप अपुरा पडल्यामुळे अनेकजण मैदानातच रणरणत्या उन्हात थांबून होते. आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी करत सीमावासियांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा :