पुढारी ऑनलाईन डेस्क : महाभारत हे जगातील सर्वात मोठं महाकाव्य मानलं जातं. जगातील सर्वात मोठं युद्ध म्हणून 'महाभारता'चा उल्लेख केला जातो. मात्र, त्याच्या भौगोलिक पुराव्यांवरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. महाभारतची साक्ष देणाऱ्या हस्तिनापुरमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं तळ ठोकला आहे.
पुरातत्व खात्यांच्या मेरठ मंडलच्या प्रमुखांच्या आदेशानुसार आधुनिक उपकरणांसहीत उत्खननाचा पहिला भाग सुरू करण्यात आला आहे. अमृतकूपशेजारी असणाऱ्या टेकडीजवळ एक गोलाकार आकृती सापडलेली आहे. ज्यामध्ये 'महाभारता'संदर्भात पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
पुरातत्व विभागाच्या एका टिमने पांडव टेकडीमधील माती काढली. तेथून त्यांना काही भांडी हाती लागली आहेत. तसेच प्राचीन भिंतींची सफाई करून व्यापक प्रमाणात टप्प्याटप्प्याने उत्खनन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत ६ ठिकाणे अधोरेखित करण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डाॅ. संजय मंजुल आणि सहाय्यक संचालक आरती यांनी सांगितले की, "सप्टेंबरमध्ये हस्तिनापुरात उत्खननला सुरूवात होणार आहे. येथे 'महाभारत'मधील काही पुरावे सापडण्याची शक्यता आहे.
५००० वर्षांपुर्वीचा रथ आणि ११६ मानवी सांगाडे सापडले
डाॅ. अमित पाठक म्हणतात की, "२००५ आणि २०१८ मध्ये हस्तिनापुरमधून ८० किलोमीटरपर्यंत बागपतमधील सिनौली येथे उत्खनन करण्यात आले आहे. यामध्ये ११६ माणसांचे सांगाडे मिळाले. जे जगात पहिल्यांदा पहाण्यात आले आहेत."
"याच ठिकाणी ५००० वर्षांपुर्वीचा जुना रथ सापडला आहे. या रथाला 'महाभारता'चा सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. एक शवपेटीदेखील मिळालेली आहे, त्याचावर पुरातत्व खात्याकडून संशोधन सुरू आहे", अशी महत्वाची माहिती डाॅ. पाठक यांनी दिली.
६० च्या दशकात हस्तिनापुरावरून पेटला होता वाद
१९५०-५१ मध्ये भारतीय पुरातत्वचे पितामह प्रो. बीबी लाल यांनी हस्तिनापुरात एका टेकडीमध्ये उत्खनन केले होते. तेव्हा कौरव-पांडवांची हस्तिनापूर नगरी आहे का, यावरून इतिहासकारांमध्ये एक वाद पेटला होता.
प्रो. बीबी लाल यांनी उत्खनन केल्यानंतर त्यांना काचेचे आणि क्रिस्टलचे रंगीत भांड्यांचे तुकडे सापडले होते. ते ४००० वर्षांपुर्वीचे होते. डाॅ. पाठक म्हणतात की, "अशाप्रकारची भांडी जगाच्या कोणत्याही भागात आणि कोणत्याही संस्कृतीत सापडलेली नाहीत."
"जुन्या गंगेत बोरवेलने उत्खनन केल्यानंतर पुन्हा तीच भांडी सापडली यारून महाभारत काळातील विकसित संस्कृती होती, याची पुष्टी झालेली होती. नंतरच्या काळत गंगेच्या महापुरामध्ये ही संस्कृती नष्ट झाली", असंही डाॅ. पाठक यांनी सांगितले.
इतिहासकार आणि संशोधक काय म्हणतात?
पूर्वी हस्तिनापूरच्या इतिहासावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातूव प्रो. बीबी लाल यांनी १९५०-५१ मध्ये उत्खनन सुरू केले. त्यातून सिद्ध झाले की, पुराणामध्ये हस्तिनापुराचं वर्णन केलेलं आहे.
येथील प्रत्येक टेकडीमध्ये महाभारत इतिहासाची पानं फडफडताहेत. सिनौलीचे उत्खनन 'महाभारता'चे पुरावे सिद्ध करून इतिहााची पानंच बदलून टाकली आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर आणखी उत्खनन केले, आणखी नवे पुरावे सापडण्याची शक्यता आहे.