पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधानपदाच्या स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरी यांच्या चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घौडदौड अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्येने आमदारांना निवडून दिल्यानंतरही सरकार न बनविण्याचे षडयंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीपद गुण पाहून द्यायचे की जात पाहून, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल, तर भाजप सुद्धा जातीय राजकारण करतो हे सिद्ध झाले आहे.
मी सरकार मध्ये नसणार, असे जाहीरपणे सांगितल्यानंतरही त्यांना कालच शपथ घेण्याची सक्ती करून, जाहीर आदेश देऊन भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा अपमानच केला आहे. हे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटरवरच राहील, हे पहिल्याच दिवशी राज्याला दाखवून दिले असल्याचे दवे म्हणाले.