नाशिक, (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
भगूर देवळाली जवळील वंजारवाडी परिसरात घराची भिंत कोसळून दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत घराची भिंत अंगावर कोसळल्याने पती पत्नी जागीच ठार झाले. सुदैवाने त्यांच्या तीन मुली व एक मुलगा या दुर्घटनेतून वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. मुसळधार पावसाने अनेक दुर्घटना घडल्या असून वंजारवाडी येथे एक घर कोसळले. गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्घटना घडली. छबू सिताराम गवारे(38) व मंदाबाई छबु गवारे (35) या दोघा पती-पत्नीचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले, मात्र गंभीर मार लागल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
वंजारवाडी येथील गवारे कुटुंबावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वी या परिसरात ढगफुटी सद्श पाऊस झाला होता. शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील येथे नुकतीच भेट दिली होती.