छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे पुन्हा युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. १२ नाेव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान चौंडी (ता. जामखेड, जि. नगर) ते नागपूर, अशी ही यात्रा निघेल. दररोज किमान २३ ते २५ कि.मी. यात्रा चालेल. युवांच्या मागण्यांसोबतच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, ही प्रमुख मागणी असेल, अशी माहिती रोहित पवार यांनी ८ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षण अंदोलनामुळे त्यांची २७ आॅक्टोबरला त्यांनी ही यात्रा स्थगित केली होती. (Yuva Sangharsh Yatra)
२४ आॅक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी आ. रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे पवारांनी अवघ्या तीन दिवसांत २७ आॅक्टोबरला ही यात्रा स्थगित केली होती. आता त्यांनी पुन्हा दिलेला शब्द पाळला पाहिजे, असे म्हणत यात्रेची घोषणा केली. ही यात्रा १२ नोव्हेंबरला चौंडी येथून सुरु होईल. १२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपुरला पोहोचेल. पहिल्या टप्प्यात ही यात्रा रोज १६ ते १८ कि.मी. अंतर चालणार होती. आता दिवस १५० ते १८० यात्रेकरू २३ ते २५ कि.मी. अंतर चालतील, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
युवकांच्या प्रमुख मागण्या घेऊन ही यात्रा सुरु केली होती. यात शासकीय पदभरती व रोजगार, औद्योगिक विकास व गुंतवणूक, कृषी, शिक्षणण व कौशल्य विकास, कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक व क्रिडा आदी विषय असतील. याशिवाय मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षण, जातनिहाय जनगणनाना आदी मागण्या लावून धरल्या जाणार आहेत, असे पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी यंदाची दिवाळी लोकांसोबतच साजरी करण्याचे नियोजन केले आहे. ते म्हणाले, १२ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन आहे. सकाळी ९ वाजता चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात होईल. तेथून ही यात्रा अंबड (जि. जालना) येथे मत्सोदरी देवीचे दर्शन घेऊन सिंदखेड राजा येथे पोहचेल. तेथे राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला अभिवादन करून दीपोत्सव साजारा केला जाईल. १४ नोव्हेंबरला दीपावली पाडवा सकाळी ९ वाजता बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे साजरा केला जाईल. तसेच, १५ नोव्हेंबरला पारनेर तालुक्यात विधवा भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा