पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज उर्फ करणवीर बोहरा याच्यासह सहा जणांविरूद्ध एका महिलेने फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईमधील ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिनेता करणवीर बोहरासह सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या महिलेने म्हटले आहे की, करणवीर बोहरासह सहाजणांनी तिच्याकडून १.९९ कोटी रुपये घेतले. ते २.५ टक्के व्याजाने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या रक्कमेपैकी आतापर्यंत केवळ एक कोटी रुपयेच परत करण्यात आले आहेत. अद्याप यातील काही रक्कम परत न मिळाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. उर्वरित पैशाची मागणी केल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या महिलेने सांगितले आहे.
करणवीरनं पैसे घेताना अडीच टक्के व्याजाने पैसे परत करणार असल्याचे सांगितल्यावर महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पैसे व्याजाने दिले. याप्रकरणी करणवीरनं त्याच्या फ्लॅटच्या कागदपत्रांचे झेरॉक्स देखील या महिलेला दिले, असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.
२०१९ मध्ये अभिनेता करणवीरचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा करणवीरची ओशिवरा भागात राहणाऱ्या या महिलेशी मैत्री झाली. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याने या महिलेकडून ३५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा त्याने १ कोटी ६६ लाख रुपये घेतले, असा दावा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेने केला आहे. हे घेतलेले पैसे परत न दिल्याने संबंधित महिलेने ओशिवरा पोलीस ठाणे गाठत या प्रसिद्ध अभिनेत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. करणवीरने १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजा' या चित्रपटातून आपल्या बॉलीवूडमधील करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांने टीव्ही मालिकांमध्ये चांगल्या पद्धतीने कारकीर्द केली. 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'क्या हादसा क्या हकीकत', 'कुसुम', 'शरारत', 'कसौटी जिंदगी की', 'पिया के घर जाना है', 'एक से बढ़कर एक', 'कुबूल है', 'कुमकुम भाग्य' और 'नागिन 2' हिंदीमधील या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.