मुंबई: पुढारी वृत्तसेवा: विधान परिषदेच्या निवडणुकीत मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष आणि अमरावती व नाशिकची जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (दि.११) माध्यमांशी बोलताना दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्रित व एकदिलाने लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
आज मराठवाड्याचा व नागपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या अमरावतीचा अर्ज दाखल करणार आहे. या बैठकीमध्ये इतर पक्षांनी जे अर्ज दाखल केले आहेत. त्या सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार वजाद मिर्झा, माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?