नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पुढील पाच वर्षात 200 पेक्षा जास्त विमानतळ, हेलिपोर्ट तसेच वॉटर एअरोड्रोमची उभारणी करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी ( दि.७) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरु या विमानतळांची एकत्रित प्रवाशी क्षमता 22 कोटी इतकी आहे. नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील जेवर येथील विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर देशातील विमानतळांची प्रवाशी क्षमता 41.5 कोटींवर जाईल. हवाई वाहतूक उद्योगात येत्या काही वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. यात खासगी क्षेत्राकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचाही समावेश आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून 25 ते 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
ईशान्य भारतात अलीकडील काळात आठ नवीन विमानतळ कार्यान्वित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पर्यंत अरुणाचल प्रदेशात एकही विमानतळ नव्हता. पण आता या राज्यात तीन विमानतळ आहेत. सिक्कीममध्ये देखील विमानतळ सेवेत आले आहे. गो एअर कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर ठराविक मार्गावर तिकीट दर गगनाला भिडले आहेत, असे सांगितले असता तिकीट दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विमान कंपन्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा