Latest

Fever : ताप का येतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण

अनुराधा कोरवी

राग आल्याशिवाय जशी लढाई होत नाही तशी तापाशिवाय जंतूंशी लढाई होत नाही. ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणाऱ्या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान नियंत्रण केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे. शरीराच्या तापमानाप्रमाणे नाडीचे ठोके वाढतात. (Fever)

सर्वसाधारणपणे एक डिग्री फॅरनहाईटने ताप वाढला, की नाडीचे ठोके प्रतिमिनिट दहाने वाढतात. नाडीचा हा अपेक्षित दर एक-दोन अपवाद सोडता सर्व आजारांमध्ये दिसतो. अपवाद म्हणजे विषमज्वर, कावीळ आणि मेंदूच्या आवरणाची सूज. या तीन आजारांमध्ये, अपेक्षित असल्यापेक्षा नाडीचा वेग कमीच असतो. शरीरात रक्तातल्या पांढऱ्या पेशींची रोगजंतूंविरुद्धची लढाई चालू असते. या लढाईतून निघणाऱ्या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो. बारीक ताप असेल तर ताप उतरवण्याची आवश्यकता नसते. मात्र, ताप जास्त असेल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक ठरते.

तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते. ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करावा लागतो. १०० च्या वर १०३ पर्यंत मध्यम ताप समजला जातो. १०३ व पुढे जास्त ताप असे मानले जाते. जास्त ताप आला असेल तर विषमज्वर, न्यूमोनिया, मेंदूसूज किंवा मूत्रमार्गदाह यांपैकी आजाराची शक्यता असते. Fever

जास्त ताप असल्यास रुग्णास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. तापात चढउतार असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा तरी तापमान घ्यावे लागेल. ताप कधी किती चढतो आणि उतरतो यावरून रोगनिदानाला मदत होते. साध्या थर्मामीटरऐवजी डिजिटल थर्मामीटर मिळतो. यात तापाचा सरळ आकडाच दिसतो. त्यामुळे ताप नेमकेपणाने मोजणे व त्यावर वेळीच योग्य ते उपचार करणे शक्य व अधिक सोपे होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT