नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नागरी सन्मान समारंभ-१ दरम्यान वर्ष २०२२ साठीचे दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ५४ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. या सोहळ्यात वाराणसीचे १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद यांना त्याच्या योग कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते साधी वेशभूषा आणि अनवाणी पायांनी सभागृहात पोहोचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यातील खास म्हणजे, १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे नतमस्तक झाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनीदेखील खाली झुकून त्यांना नमस्कार केला. यामुळे १२६ वर्षाचे योगगुरू स्वामी शिवानंद याच्याबद्दल जाणून घेवूयात…
योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या पुढेही ते खाली झुकून नतमस्तक झाले. तर कोविंद यांनी सुद्धा योगगुरूंना अभिवादन करत त्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वयाच्या १२६ व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद स्वतः दिल्लीच्या दरबारात पोहोचले होते. नियमित योगासनामुळे या वयातही त्यांनी स्वत:ला निरोगी ठेवले असल्याची माहिती आहे. स्वामी शिवानंद हे सध्या वाराणसी येथील काशीत राहत आहेत. योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार हे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली असल्याचे ते नेहमी आपल्या चाहत्यांना सांगत असतात. तसेच त्यांनी स्वत: दररोज पहाटे ३ वाजता उठून योगासने आणि श्री गीतेचे पठण करत असल्याचे सांगितले आहे.
स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालमधील सिलेट जिल्ह्यातील हरिपूर गावात झाला. सहा वर्षाचे असताना ते त्यांच्या आई-वडील आणि बहिणीचा मृत्यूनंतर काशीला आले होते. याच दरम्यान त्यांनी कुटूंबियाना मुखाग्नी देण्यास नकार दिला होता. यानंतर स्वामी शिवानंद यांनी गुरु ओकांरानंद यांच्याकडून दीक्षा घेतली.
स्वामी शिवानंद वयाच्या २९ व्या वर्षी लंडनला गेले तर वयाच्या ३४ व्या वर्षीपर्यंत संपुर्ण जग फिरले आहेत. या काळात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया इत्यादी देशांची दौरा केली आहे. यानंतर त्यानी भारतातील काशी येथे येवून योग प्रसार करण्यासाठी संपुर्ण जीवन खर्ची केले आहे. स्वामी अजूनही उकडलेले अन्न खातात आणि अतिशय साधे जीवन जगतात. यामुळेच त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?