पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात दक्षिण आफ्रिकेतून आठ चित्ते आणले गेले. त्यानंतर ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहेत. या चित्त्यांना खाद्य म्हणून १८०० हरीण व चितळ साेडण्यात आली आहेत. यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या. राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधील बिश्नोई समाज आक्रमक झाला असून, या निषेधार्थ त्यांनी हरियाणात धरणे आंदाेलनही सुरु केले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले कुलदीप बिश्नोई यांनी देखील यावर आक्षेप घेतला आहे. बिश्नोई समाजाने पंतप्रधानांना पत्र लिहित, हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी केली आहे. बिश्नोई समाजात वन्य प्राण्यांच्या महत्त्वाविषयी जाणून घेवूया…
बिष्णोई समाज हा प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनाही त्यांचे जगण्याचा हक्क असल्याचं मानतात. या समाजातील लोक हे निसर्गाला देव मानतात. निसर्गातील प्रत्येक घटकाच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. वन्य प्राणी आणि झाडांसाठी या समाजातील लोक आपला जीवसुद्धा द्यायला तयार असतात.
काळवीटाला बिश्नोई समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. काळवीट हे गुरु भवान जांम्बेश्वर यांचे रुप असल्याचं हा समाज मानतो. त्यांचे आराध्यदैवत असलेले गुरू जंभेश्वर यांनी दिलेल्या २९ नियमांचे पालन करतात. यापैकी एक नियम म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण आणि झाडांच्या संरक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळेच ते काळवीटाला देवाच्या स्थानी मानतात. काळवीटांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं हा या समाजाच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हा असल्याचे मानले जाते.