पुढारी ऑनलाईन: मागच्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र सध्याच्या माहितीनुसार लवकरच म्हणजे १४, १५ ऑक्टोबर दरम्यान मान्सून परतणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
उत्तरकाशी, नझीबाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम, भरूच या भागातून मान्सूनची माघार घेण्याची रेषा पुढे सरकत आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील काही भागांत मॉन्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची दाट शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले होते. यानंतर १४, १५ ऑक्टोबर दरम्यान मध्य भारताच्या बऱ्याच भागांसह महाराष्ट्रातूनही पाऊस कमी होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या दरम्यान पावसाचा कोणताही ईशारा नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
पुढील काही तासात देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडू शकतो. स्कायमेट हवामानानुसार, पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.