Latest

नाशिकजवळील अपघातात वाशीम जिल्ह्यातील १ ठार; ११ प्रवाशी जखमी

अविनाश सुतार

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : नाशिकजवळील मिर्ची फाटा येथे आज (दि.८) पहाटे आराम बस व ट्रेलरचा अपघात झाला. वाशीम जिल्ह्यातील १३ जण या आराम बसमधून प्रवास करत होते. यापैकी मालेगाव तालुक्यातील तरोडी येथील उध्दव भिलंग (वय ४५) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेला त्यांचा पुतण्या वैभव भिलंग याचा अजूनही पत्ता लागत नसल्याचे समजते. याबाबत वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयाने पुष्टी दिली आहे.

नाशिक जवळील मिर्ची फाटा येथे शनिवारी सकाळी ५ च्या सुमारास भरधाव आराम बस व ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस जळून खाक झाली. या अपघातात वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तरोडी येथील उद्धव भिलंग यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या सोबत असलेला त्यांचा पुतण्या वैभव भिलंग याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

या अपघातात भगवान श्रीपाद मनवर, प्रभादेवी केशव जाधव, आर्यन गायकवाड, पूजा गायकवाड, साहेबराव जाधव, अंबादास वाघमारे, किरण चौगुले, अनिता चौगुले, महादेव धोत्रे व इस्माईल रसूल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जखमी व मृतांबाबत अजूनही खात्रीलायक माहिती प्राप्त होत नसल्याने वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दुरध्वनी सारखे खणखणात आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT